बेशिस्त वाहनांनी रोखला नेरळ स्टेशनबाहेर पडण्याचा मार्ग कोंडीमुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांची घुसमट, वाहतूक पोलीस नेमण्याची होतेय मागणी

नेरळ: सुमित क्षिरसागर

नेरळ रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना सकाळ संध्याकाळी बेशिस्त वाहने आणि वाहतूक कोंडीमुळे दमछाक होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नेरळ शहरवासी करत आहेत. लोकल ट्रेन आगमनाच्या वेळी प्रवेशद्वारावरच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातून वाट काढण्यासाठी अनेकदा वाहन चालक आणि प्रवाशांत बाचाबाची चे प्रकार घडतात. वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमावा अशी नेरळकर नागरिकांची मागणी होत आहे.
नेरळ रेल्वे स्टेशन परिसरात दोन्ही मार्गांवर विशेष वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. रस्त्यावर वाहने उभी केल्या मुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांसह पादचारी धडपडत चालत आहेत.
स्टेशन परिसरात वसंत भोजनालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यालगत वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहन चालकांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. नेरळ शहरात वाढत्या नागरीकरणामुळे रहदारीवर ताण पडत आहे.
नेरळ शहरातील मेन रोडवरील दुकानांसमोर वाहने थांबवण्याची व्यवस्था नसल्याने रहिवाश्यांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. त्यातच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस यांचा हस्तक्षेप नसल्याने बेशिस्त वाहन चालकांमुळे नेरळ शहराची वाहतूक व्यवस्था जटिल बनलेली आहे. रस्त्यांवरून चालताना नागरिकांना बेशिस्त वाहनांमुळे स्थानिक नागरिकांना आणि येणाऱ्या पर्यटक व वयस्कर नागरिकांची वाट काढताना दमछाक होत आहे.



